Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

ऐतिहासिक विश्‍वविजय

गो-या सायबाने भारतात पाय रोवले आणि त्याबरोबरच रूजवला आपला खेळ. क्रिकेट. या क्रिकेटने भारतीय मनांवर अशी काही जादू केली की मुळचा गोर्‍यांचा हा खेळ आता जणू काही भारताचाच राष्ट्रीय खेळ वाटावा असे स्थान पटकावून आहे. अर्थात या खेळात भारतीयांनी साधलेली प्रगती हेही त्याचे कारण आहे. खेळ गोर्‍यांचा असला तरी त्यावर वेस्ट इंडिजच्या राकट आणि रासवट खेळाडूंचे बराच काळ वर्चस्व होते. दोन विश्वकरंडक जिंकून त्यांनी ते दाखवून दिलेच होते. पण १९८३ मध्ये कपिल देवच्या भारतीय संघाने हे वर्चस्व झुगारून देऊन या करंडकावर भारताचे नाव कोरले आणि एक नवा इतिहास लिहिला. २५ जून १९८३ हा तो दिवस. आज बरोब्बर २५ वर्षे झाली या घटनेला.....

वेस्‍ट इंडीज, इंग्‍लंड व ऑस्‍ट्रेलिया या बड्या देशांच्या मांदियाळीत आशियायी देशाने विश्‍वकरंडक जिंकणे हे केवळ स्‍वप्‍नच. मात्र, मोठे ध्‍येय साध्‍य करण्‍यासाठी हवी असते कठोर मेहनत, योग्‍य नियोजन आणि एकाच ध्‍येयाने झपाटलेली वेडी माणसे. ही 'फायर' आणि 'पॅशन' 1983 च्‍या भारतीय संघात होती आणि म्‍हणूनच गो-या सायबाच्‍या देशात त्‍यांचीच मक्‍तेदारी असलेल्‍या क्रिकेटमध्‍ये जगज्‍जेता ठरून 24 वर्षीय कपिलच्‍या भारतीय धुरंधरांनी क्रिकेटच्‍या पंढरीत (लॉर्डस्) डौलाने तिरंगा फडकवला. 'हम भी कुछ कम नही' हेही जगाला दाखवून दिले. 150 वर्षांची ब्रिटीशांची गुलामगिरी झुगारून 15 ऑगस्‍ट 1947 ला भारतीय भूमीवर तिरंगा फडकविताना ज्‍या अभिमानाने प्रत्‍येक भारतीयाची छाती फुलारली. तोच अभिमान 25 जून 1983 या दिवशी ब्रिटीश भूमीवर विजयाचा तिरंगा फडकाविल्‍यानंतर अनुभवता आला.

आज आढळणारा क्रिकेटचा 'फिवर' त्‍याकाळी नव्‍हता किंवा मंडळाकडून खेळाडूंना आज मिळणा-या सुविधाही त्‍यावेळी मिळत नव्‍हत्‍या. या प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेला विजय म्‍हणूनच महत्‍वाचा ठरला. ज्‍या ब्रिटीशांनी १७२१ मध्ये भारतीयांना क्रिकेटची सर्वप्रथम ओळख करून दिली. त्‍यांच्‍याच भूमीवर तब्‍बल 52 वर्षांनी आपण जगज्‍जेते ठरलो हा सुवर्ण योग म्‍हटला पाहिजे.

आणि स्‍वप्‍न साकार झाले...
सलग दोन विश्‍वकरंडक स्‍पर्धा जिंकून जगज्‍जेते ठरलेल्‍या वेस्‍ट इंडिजच्‍या संघाकडे सामना सहज जिंकू असा आत्‍मविश्‍वास होता. तर प्रथमच अंतिम सामन्‍यापर्यंत मजल मारलेल्‍या भारतीय संघासमोर मोठे आव्‍हान आणि म्‍हणूनच विंडीजने जेव्‍हा नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तेव्‍हा 60 षटकांच्‍या या सामन्‍यात 54.4 षटकात सर्व गडी बाद 183 धावाच करता आल्‍या. अर्थात त्‍यावेळच्‍या क्रिकेटच्‍या भाषेत ही धावसंख्‍या आव्‍हान देण्‍या इतपत असली तरीही जगज्‍जेत्‍या विंडीजला ती सहज शक्‍य होती. त्‍यानंतर गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख्‍ा बजावत 52 षटकांतच विंडीजचे सर्व गडी बाद करून त्‍यांना 140 धावांवरच रोखले. आणि स्‍वप्‍नवत वाटणारे विश्‍वविजयाचे स्‍वप्‍न साकार झाले. प्रचंड जल्‍लोष... आणि उत्‍साह या एकाच घटनेने भारतीयांमध्‍ये निर्माण झाला. भारतात क्रिकेटची आज जी लोकप्रियता पहायला मिळते त्‍यात या विजयाचा मोठा वाटा आहे.


दोन वेळा विश्‍वकरंडक स्‍पर्धेतून माघारी परतलेल्‍या आणि काही दिवसांपासून सातत्‍याने निराशाजनक खेळी करणा-या भारतीय संघाकडून विजयाची अपेक्षाही कुणी केली नसावी. मात्र, कपिलच्‍या नेतृत्‍वातील संघाने विजयाचे स्‍वप्‍न पाहिले आणि ते साध्‍यही करून दाखविले. त्‍यावेळच्‍या विश्‍वविजेत्‍या संघात कपिल देव (कर्णधार), सुनील गावसकर, कृष्ण्माचारी श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ, यशपाल शर्मा, संदीप पाटील, कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी, मदन लाल, सय्यद किरमाणी, बलविंदर सिंग संधु हे शिलेदार होते. या संघाने भारतीयांना विजयाची चव काय असते याची प्रथमतः जाणीव करून दिली आणि तो एन्‍जॉय करायलाही शिकविले.


या स्‍पर्धेपूर्वीच विंडीजने भारतीय संघाला कसोटी व एक दिवसीय सामन्‍यात पराभूत केले होते. बलाढय संघांशी साखळी सामने खेळावे लागणार असल्‍याने असा विजयही स्‍वप्‍नवतच होता. मात्र 1983 मध्‍ये या 14 शिलेदारांनी घडविलेला इतिहास अविस्‍मरणीय असाच म्‍हणावा लागेल. विश्‍वविजेता बनण्‍याच्‍या या आशा नंतर 2003 मध्‍ये सौरव गांगुलीच्‍या नेतृत्‍वाखालील संघानेही दक्षिण आफ्रिकेत झालेल्‍या विश्‍वकरंडक स्‍पर्धेत अंतिम सामन्‍यापर्यंत मजल मारून पल्‍लवीत केल्‍या. मात्र बलाढय ऑस्‍ट्रेलियाने हा सामना आपल्‍याकडून हिरावून नेला. या विजयाची पुनरावृत्ती वाटेल अशी कामगिरी गेल्या वर्षी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या खेळाडूंनी ट्वेंटी २० क्रिकेटचा विश्वकरंडक जिंकून केली. कपिलच्या संघाने लॉर्डसवर मिळवलेला विजय हाच पुढच्या विजयांची रूजवात करणारा ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

नकार